पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना १६ कोटींचा निधी

रत्नागिरी:- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत २०२३-२४ अंतर्गत अबंधितसाठी १६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकास आराखड्यानुसार गावोगावी विकासकामे होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना याचा लाभ होणार आहे.

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी २०२३-२४ च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी ८४६ ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरित निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या मंजूर आराखड्यातील सर्व कामे अंतर्गत रस्ते, शाळा, अंगणवाडी दुरुस्ती, सोलर दिवे, स्मशानभूमी दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.