रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी प्रारंभ झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला तरी देखील महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. नारायण राणे, किरण सामंत की आणखी कोणी याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. ही लोकसभा निवडणूक आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लढवली जात असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. नेमक घोड अडले कुठे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार निवडताना पुढील ५ ते १० वर्षाचा विचार केला जात आहे. भारतीय जनता पार्टीला महायुतीने ही जागा सोडली तर शिवसेनेला मोठा ‘फिडबॅक’ बसेल, असा अंदाज शिवसेना पक्षाच्या नेत्यांचा आहे. तर भारतीय जनता पार्टीला या उमेदवारीचा निश्चित फायदा होईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचा पाठींबा सक्रिय लाभला तर या दोन्ही पक्षांना भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. मतदारांची संख्या घसरेल, असा अनुमान वरिष्ठ पातळीवर काढण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाला उमेदवारी मिळाली तर भाजपाचे कमाल नुकसान होणार आहे. आज भाजपाकडे केवळ एक विधानसभा ताब्यात आहे. या उमेदवारीमुळे भाजपाला मोठा विस्तार करता येईल. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाच्या निर्णयाची वेळ जवळ आली आहे. भाजपाला मिळणारी संधी निश्चितच या पक्षाला कमाल यशाकडे घेवून जाईल. त्यामुळे भविष्यात भाजपाला विधानसभेत काही जागा मिळवण्यात निश्चितच यश येईल. भाजपासाठी उमेदवारी अत्यावश्यक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे कमळ या चिन्हावर भाजपा निवडणुक लढविण्यास तयार आहे. त्यासाठी फक्त ना. राणे यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. याचवेळी शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनीही किरण सामंत यांच्या उमेदवारीचा शिवसेनेतर्फे आग्रह कायम ठेवला आहे. फायद्या-तोट्याचे गणित करताना बरेच पाणी मुरुन गेले असल्याने आता महायुतीला उमेदवार, चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यात खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. उमेदवारी जाहीर करण्यासाठी फार उशीर झाल्याचे म्हटले जाते. शिवसेनेचे चिन्ह मतदारांमध्ये परिचित आहे. तर कमळ चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकांना आणि भाजपा कार्यकर्त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. निवडणुकीची राजकीय गणिते फार सोपी नाहीत, असे दिसून येत आहे. २०१९ मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांना ४,५८,०२२ इतके मताधिक्य पडले होते. तर स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांना २,७९,७०० इतकी मते पडली होती. त्यावेळी त्यांना भाजपाचा पाठींबा होता. कॉंग्रेसपक्षाचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३,२९९ आणि वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी यांना ३०,८८२ मते पडली होती. तसेच इतर उमेदवारांना ३२,००० इतकी मते पडली होती. हे पहाता भाजपाला २०२४ ची निवडणुक काही अंशी जड जाणार इतके नक्की. कारण महायुतीकडे देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष सोबत आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांचे पारडे काही अंशी आजच्या स्थितीत जडच आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट), चिपळूण विधानसभा मतदारसंघ शेखर निकम (राष्ट्रवादी), रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ उदय सामंत (शिवसेना), राजापूर विधानसभा मतदारसंघ राजन साळवी (शिवसेना ठाकरे गट), देवगड विधानसभा मतदारसंघ नितेश राणे (भाजपा), कणकवली विधानसभा मतदारसंघ वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट), सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिपक केसरकर (शिवसेना) या आमदारांची ताकद जर आपल्या मतदारसंघात पहावयाची असेल तर या आमदारांचे कार्यक्षेत्र आणि पक्ष याचा विचार प्राधान्याने करावा लागेल. भाजपाकडे आज नितेश राणे आमदार आहेत तर शिवसेना पक्षाकडे दिपक केसरकर, उदय सामंत हे दोन आमदार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडे वैभव नाईक, भास्करराव जाधव, राजन साळवी हे आमदार आहेत. महायुतीचा घटकपक्ष राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मतदारसंघात संमिश्र चित्र राहणार आहे. आता उमेदवारीचे अडले कुठे? असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. त्या मतदारांना आता हे कळून चुकले असेल की, फक्त लोकसभा निवडणुक नाही तर पुढील विधानसभा आपल्या पक्षाकडे टिकवून ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे.