रत्नागिरी:- गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या 10 रुपयात
शिवभोजन थाळी सुरू केली. परंतु शिवभोजन थाली केंद्रांना आता घरघर लागली आहे. जिल्ह्यातील 26
केंद्रांपैकी आता फक्त 12 केंद्र सुरू आहेत. 14 केंद्र बंद झाली आहेत. लाडक्या बहिण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्याच्या शासनाच्या हालचाली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 48 लाख 89 हजार अनुदान प्राप्त झाले असून 89 लाख 93 हजार 750 एवढे अनुदान शिल्लक आहे.
शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यात दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. कोरोनाकाळात तत्कालीन शासनाने ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येते. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे. जिल्ह्यातील 26 शिबभोजन केंद्र मंजूर आहेत. त्यांना 3050 थाळ्या मंजूर आहेत. परंतु या केंद्रांपैकी 12 केंद्रच सुरू आहेत. १२ शिवभोजन केंद्रांवर १० रुपयात जेवण दिले जाते. मजुरांची उपासमार टळावी, यासाठी शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरु केली. यामध्ये भात, चपाती, आमटी, भाजीचा समावेश आहे. या केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागे लाभार्थीचे १० रुपये आणि शासनाकडून ४० रुपयांचे अनुदान मिळते. परंतु शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे. त्याचा मोठा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. तो कमी करण्यासाठी कोरोनापासून सुरू असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू आहेत. ही योजना बंद झाल्यास शासनाचा खर्च कमी होणार आहे. 12 केंद्रांना एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 48 लाख 89 हजार एवढे शासनाकडुन अनुदान प्राप्त झाले आहे. 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत 89 लाख 93 हजार 750 एवढे अनुदान शिल्लक आहे. केंद्रचालकांना महिना पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार यांच्याकडे देयके सादर करावी लागतात. तहसीलकडून तपासणी झाल्यानंतर ती जिल्हा पुरवठा विभागाकडे जातात. त्यानंतर संबंधित केंद्राला शासनाकडुन आलेले अनुदान दिले जाते.