रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगावध्ये रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सामंजस्याने प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी शेतकरी व स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सध्या जी काही लोक आंदोलन करीत आहेत, ती प्रकल्पासाठी जाणार्या गावातील नाहीत अशीही माहिती पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी आयोजित जनता दरबारमध्ये रिफायनरी समर्थक ग्रामस्थ आपल्या भेटीला आले होते. हा प्रकल्प झाल्यास प्राधान्याने स्थानिकांना यात नोकर्या मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतही भूमिका व्यक्त केली. त्याचप्रमाणे आंदोलन करीत असलेल्या व्यक्तींचा प्रकल्पाच्या जमिनींशी व गावाशी काहीही संबंध नसल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पोलीस व प्रशासनाला याबाबत माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातील, त्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. हा प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन पुढे नेला जाणार आहे. या प्रकल्प झाल्यामुळे राजापूरसह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान, काहीजण या प्रकल्पाबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. काही आंदोलकांना पोलीस व प्रशासनाने काढलेल्या नोटीसांबाबत आपल्याला माहिती नसून, त्याची माहिती घेऊ असे सांगितले.
रत्नागिरीतील स्टरलाईट प्रकल्पाच्या जागेबाबत न्यायालयात दि. 29 नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता ना. सामंत यांनी व्यक्त केली. इलेक्ट्रिक व्हेईकलप्रमाणेच राज्यात हायड्रोजन पॉलिसी राबवून दोन, चार चाकी वाहने व बोटी निर्माण होऊन त्याचा वापर वाढेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी अमेरिकेतील उद्योजकांशी एमओयु केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.