रत्नागिरी:- कर्तव्यदक्ष, प्रामाणिक महिला पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा पोलीस मुख्यालयातील हेडकॉन्स्टेबल सांची सुदेश सावंत यांचा शुक्रवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला. नाटे पोलीस ठाण्यात सेवेत असताना दिवंगत् सांची यांनी प्राची बाजी लावली होती. अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलकांनी पोलीस ठाण्याला आग लावलेली असताना प्रसंगावधान राखत सांची सावंत यांनी पोलिस ठाण्यातील रायफल सुरक्षितस्थळी हलवल्या होत्या. त्यांच्या या कार्याची आठवण जागवताना त्यांचे सहकारी देखील भावूक झाले.
नऊ महिन्यांच्या गरोदर असलेल्या सांची यांना प्रसुतीसाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असताना शुक्रवारी दुपारी त्यांना अचानक चक्कर आली व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघे जिल्हा पोलीस दल हळहळले आहे. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या कामाचा प्रामाणिकपणा व प्रसंगावधानता या सगळ्याच्या आठवणी त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
राजापूर तालुक्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर या प्रकल्पाविरोधात विरोधात मोठे आंदोलन झाले होते. इतकेच नाही तर त्यावेळी एका आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्यावर हल्ला करत पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या एकमेव महिला कर्मचारी सुलभा उर्फ सांची सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत येथे असलेल्या रायफल सुरक्षित ठिकाणी ठेवल्या होत्या. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. ही अत्यंत मोठी व महत्वाची कामगिरी त्यांनी केली होती.
नाटे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना दिवंगत सुलभा पांगळे म्हणजेच सांची सावंत व त्यांचे पती सुदेश सावंत आणि खात्यातील इतर सहकारी म्हणजे प्रवीण खांबे, अजित मुजुमदार, राहुल घोरपडे, बंटी सावंत देसाई, राहुल गायकवाड, अमर मोरे, सागर मुरूडकर असे एकत्रित सेवा बजावत असताना त्यांनी दाखवलेली प्रसंगावधनता समयसूचकता खूप महत्वाची ठरली, अशी आठवण त्यांच्या एका सहकाऱ्याने व्यक्त केली.