नाचणे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित; निम्म्या शहराला करणार पाणी पुरवठा

रत्नागिरी:- साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राला जोडलेल्या आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेले नाचणे जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले आहे. पावणेचार कोटी खर्च करून काडा अॅटोमेशन यंत्रणा बसविण्यात आलेले हे केंद्र आहे. ७.५ एमएलडी एवढी या नव्या केंद्राची क्षमता आहे. शहरातील माळनाका येथून खालच्या भागासाठी या केंद्रातून शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. म्हणजे आता शीळचे पाणीही नाचणे जलशुद्धीकरण केंद्रातून येणार आहे.

नैसर्गिक उताराणे पाणी पुरवठा करणारे नाचणे जलशुद्धीकरण केंद्र आहे. परंतु हे केंद्र जुणे झाल्याने सुधारित पाणी योजनेमध्ये या केंद्राचे काम घेण्यात आले. शीळ, पानवल या दोन धरणामधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यानंतर पुढील दोन महिने पानवल धरणातून नैसर्गिक उताराने पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रात येते आणि तेथून शहरातील काही भागाला पाणी पुरवठा होतो. परंतु पानवल धरण नादुरूस्त असून त्यामध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही. त्यामुळे दहा महिन्यापासून धरणातील पाणीपुरवठा बंद आहे. या काळात जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने काम सुरू करण्यात आले. पावणे चार कोटीचे हे काम आहे. संपुर्ण केंद्राची दुरूस्ती करण्यात आली. व्हॉल्व आपोआप सुरू होणारे काडा अॅटोमेशन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. हे काम पुर्ण झाले असून येथून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे साळवी स्टॉपच्या मुख्य जलशुद्धीकरण केंद्राला नाचणे जलशुद्धीकरण केंद्र जोडण्यात आले आहे. २५० रनिंग मीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यामुळे माळनाका टाकी, निवखोल, आठवडा बाजार, राजिवडा ते मांडवी, भैरी मंदिर, झाडागाव नाका, गोखले नाका, या भागात या केंद्रावरून पाणी पुरवठा होत आहे. भविष्यात पावसाळ्यामध्ये दोन्हीकडुन पाणी घेता येईल, अशी रचना नाचणे जलशुद्धीकरण केंद्राची करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी दिली.