रत्नागिरी:- राजापूर येथील नवोदय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत होणारी बनवेगीरी रोखण्यासाठी आणि स्थानिक मुलांना तिथे प्रवेश मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेकडूनही कडक पावले उचलण्यात येणार आहेत. फक्त नवोदयमधील प्रवेशासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत प्रवेश दिल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई बडगा उगारला जाईल अशी भुमिका जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतली आहे.
नवोदय विद्यालयातील विद्यार्थी निवड प्रक्रीयेबाबत राजापूर पंचायत समितीच्या मासीक सभेत जोरदार चर्चा झाली होती. गुणवत्ता असतानाही या निविड प्रक्रियेत स्थानिकांना न्याय मिळत नसल्याचा मुद्दा अभिजित तेली यांनी उपस्थित केला होता. नवोदय विद्यालयात राजापूर तालुक्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी अशी मागणी या सभेत करण्यात आली होती. नवोदयच्या प्रक्रियेत गोलमाल होत असल्याचा ठपका काही वर्षांपुर्वी ठेवण्यात आला होता. प्रवेश प्रक्रियेच्या अटी व शर्थींमध्ये संबंधित विद्यार्थी हा जिल्ह्यातील स्थानिक शाळेमध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. यासाठी परजिल्ह्यातील लोकांकडून विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळेत प्रवेशापुर्तेच ठेवले जाते. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळत नाही. हाच मुद्दा जि. प. अध्यक्ष बने यांनी उचलून धरला असून जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नवोदय प्रवेशासाठी जिल्ह्यातील शाळांत प्रवेश घेतल्याबाबत तपासणी करण्याच्या सुचनाही शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत. नवोदय विद्यालयात सहावीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या रहिवाशी दाखल्याच्या चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत. आधार कार्डावरुन याची माहिती पुढे येऊ शकते. नवोदयमधील प्रवेशात स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार आहे. ही सभा 17 डिसेंबरला होणार आहे असल्याचे श्री. बने यांनी सांगितले.