रत्नागिरी:- कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी स्वागत अत्यंत साधेपणाने करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून नववर्ष स्वागतासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
जारी करण्यात आलेल्या मार्गदशक सुचनांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी व 1 जानेवारी रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
नववर्षाच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आयोजित करण्यात यावेत.सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टनसिंग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील अशा प्रकारे उपस्थिती ठेवावी तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.