धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 60 शाळा बिबट्याच्या हद्दीत

रत्नागिरी:- जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाडी-वस्तीवर होऊ लागला असून पाळीव प्राण्यांचा बळी जात आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्तींमध्येही भितीचे वातावरण असतेच. बिबट्याने पाळीव पशुंचा बळी घेतल्याच्या घटना घडून गेलेल्या परिसरात जिल्हापरिषदेच्या 2600 पैकी 60 टक्के शाळा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दुर्गम शाळांची यादी बनविण्यासाठी वन विभागाने दिलेल्या अहवालातून पुढे आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक बदल्यांसाठी शासनाच्या सात निकषानुसार दुर्गम भागातील शाळांची यादी बनविली आहे. त्यात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमीचा निकष आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 43 प्राथमिक शाळांचा समावेश झाला. रत्नागिरी, संगमेश्‍वरसह दापोलीतील सर्वाधिक शाळा आहेत. गावाच्या एका टोकाला प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांना जंगल भागातून किंवा मानवी वस्ती नसलेल्या मोकळ्या रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागते. तो परिसर बिबट्याच्या अधिवासातील असतो. अनेक गावात पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडत आहेत. त्या भागातील शाळांचा समावेश दुर्गममध्ये करा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी यांनी दिले होते. त्यानुसार वन विभागाकडून अहवाल मागविण्यात आला. त्यात 2600 पैकी 60 टक्केहून अधिक म्हणजेच सुमारे 1400 शाळांचा समावेश होऊ शकतो. शहराजवळील काही शाळाही त्यात घ्याव्या लागणार आहेत. दुर्गमची यादी वाढेल हे पाहून पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या परिसरात शाळा विचारात न घेण्याचा निर्णयही झाला आहे. नव्याने केलेल्या यादीत सुमारे 650 शाळा असून अंतिम यादी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीनंतर जाहीर होईल. याला शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.

जिल्ह्याचा बहूतांश भाग डोंगराळ आहे. जंगली प्राणी भक्षाच्या शोधात वाडी-वस्त्यांजवळ येतात. गुरे, कुत्रे, मांजरं यांचा माग काढत अनेकवेळा बिबटे गावात प्रवेश करतात. काहीवेळा बिबट्या घरातही शिरल्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यांवरुन जाणार्‍या दुचाकीवर हल्ल्यात माणसं जखमी झाली आहेत. या प्रकारांमुळे काही गावांमध्ये भितीचे वातावरण आजही आहे. यामधूनही माणसं सावरलेली असून बिबट्याचं येण नित्याचच झाले आहे. अधुनमधून कुत्रे, गाईंवर हल्ला केल्याच्या तक्रारी वन विभागाकडे येतात. काही दिवसांपुर्वी भोके येथे वाडीमध्ये शिरलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी पळवून लावले. हे प्रकार पुढे येत असले तरीही पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेल्या गावांची संख्या अधिक असल्याचे शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या माहितीमधून दिसते.