रत्नागिरी:- देशातील दहा लाख आशा गटप्रवर्तक महिलांना व सर्वच योजनाकर्मी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या सर्व कर्मचार्यांना दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे, यासाठी दिल्ली येथे आयटक कामगार संघटनेच्यावतीने 28 मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 200 महिला जाण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.
शहरातील मारुतीमंदिर येथील महिला मंडळ सभागृहात आशा व गटप्रवर्तक यांचा महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते शंकर पुजारी हे होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई व आयटकचे नेते प्रकाश रेड्डी, संघटनेचे सचिव सुमन पुजारी, विद्या भालेकर, पल्लवी पालकर, तनुजा कांबळे, वैशाली तांबट, संजिवनी तिवरेकर आदी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये बोलताना शंकर पुजारी यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्याची तयारी महाराष्ट्र शासनाची नसल्यामुळे त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेलीच आहे. दरम्यान सन 2018 सालापासून भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणार्या आशा व गटप्रवर्तक महिलांच्यासाठी काहीही मानधनांमध्ये वाढ केलेली नाही. म्हणूनच सर्व योजनाकर्मी कर्मचार्यांना दरमहा ताबडतोब पंचवीस हजार रुपये किमान वेतन सुरू झाले पाहिजे. यासाठी दिल्लीच्या मोर्चासाठी जोरदार तयार करावी, असे सांगितले.
या मेळाव्यामध्ये बोलताना महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांनी सांगितले की, सर्व महाराष्ट्रातून दिल्ली मोर्चास जाण्याची तयारी सुरू आहे. म्हणूनच कोकणामधून सुद्धा जोरदार तयारी करावी, असे आवाहन केले.