रत्नागिरी:- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणार आहेत. मंडळाच्या निर्देशांनुसार शाळा त्यांच्या पातळीवर या परीक्षांचे आयोजन करणार आहेत. तसेच परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्राची सुविधा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. यानुसार कोकण बोर्डातर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावीसाठी 573 तर बारावीसाठी 292 परीक्षाकेंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत.
कोरोना प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यापरीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरूवातीस ऑनलाईन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले. आता प्रचलित पद्धतीने राज्य मंडळाच्या परीक्षा होत असून, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात देखील झाली आहे.
प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी 60 होती. तर, शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने बारावीसाठी परीक्षा केंद्रांची, उपकेंद्रांची संख्या 292 इतकी असणार आहे. प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या दहावीसाठी 114 होती. तर, शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने दहावीसाठी परीक्षा केंद्रांची, उपकेंद्रांची संख्या 459 इतकी असेल.
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग, गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे.