…तर महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याला गावात फिरू देणार नाही; मनसेचा इशारा 

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत महावितरण कंपनीने लादलेली वीज बिले माफ करावीत. या विरोधात सोमवारपासून मनसे जिल्ह्यात ‘भिक मांगो’ आंदोलन करणार आहे. त्याची गंभीर दखल घेतली नाही तर महावितरणच्या एकाही कर्मचार्‍याला गावात फिरू देणार नाही. आठवडाभरानंतर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिला.

कोरोना टाळेबंदीतील विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली होती. त्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केले आहे. दीड हजार लोकांची पत्रे मनसेने शुक्रवारी (ता. 20) महावितरणच्या अधिकार्‍यांना सादर केली. या वेळी जिल्हाध्यक्ष चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, अविनाश सौंदलकर, महेंद्र नागवेकर, सचिन साळवी, राजेश पवार, सतीश राणे, रूपेश जाधव, छोटू खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील 80 टक्के जनता मजूर व शेतकरी आहे. टाळेबंदीतील वीज बिलापोटीची माफी मिळाली पाहिजे. वीज बिल माफी करावयाची नसेल तर जमिनदार शेतकर्‍यांना नियमानुसार मागील अनेक वर्षापासून विद्युत खांबासाठी वापरलेल्या जमिनीचे भाडे व नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली आहे. यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. महिन्याभराचा कालावधी गेल्यानंतर अपेक्षित उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे शासन व कंपनीच्या विरोधात ‘तुमची वीजच नको’ ही मोहीम मनसेने घेतली आहे. वीज बिल महावितरण माफ करणार नसेल तर वीज मीटर काढून न्या. त्यापूर्वी शासनाने जागेचे भाडे द्या, असे नमूद केले आहे.

‘मी स्वतः मजूर असून माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रोजीरोटीही नाही. त्यामुळे आपल्या कंपनीकडून देण्यात आलेले वीज बिल भरणे मला शक्य नाही. माझ्या निवासस्थानी बसवलेला वीज मीटर तत्काळ काढावा तसेच गेल्या अनेक वर्षांपासून माझे जमिनीत असलेले आपल्या कंपनीचे विजेचे खांब व वीजवाहिन्या यांचे भाडे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, या आशयाची पत्रे महावितरणकडे सुपूर्द केली आहेत.