डॉ. भास्कर जगताप यांनी स्वीकारला जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार

रत्नागिरी:- आपण रुग्णांसाठी आहोत याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवले पाहिजे, आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, जाबाबदारी झटकून चालणार नाही. रुग्णालयात स्वच्छता कायम राहिली पाहिजे.तुम्हाला सर्वांना सोबत घेवून मला काम करायचे आहे. आठ तास आपण काम करतो त्यावेळेत हलगर्जीपणा मला चालणार नाही. माझा त्रास तुम्हाला होणार नाही, पण मला पेन उचलायला भाग पाडू नका, सर्वांनी कुटुंब म्हणून काम करुया असे आवाहन नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी कर्मचार्यांना केले.

मंगळवारी डॉ. भास्कर जगताप जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी कार्यालय कर्मचारी, परिचारिका यांची ओळख करुन घेतली. त्यानंतर त्यांना मार्गदर्शन केले. आपण सर्वजण रुग्णालयात काम करतो. येथे येणारा रुग्ण हा गरिब घरातून आलेला असतो, त्याच्या खिशात पैसे नसतात. जिल्हास्तरावरील रुग्णालयात आल्यामुळे एकतर तो घाबरलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला धीर देवून त्यांच्यावर उपचार करुन, त्याला बरे करुन परत आपल्या घरी सुखरुप पाठविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. रुग्ण रुग्णालयातून बरा होऊन जातो हे क्षण आपल्यासाठी जिवनात आंनद देणारा आहे. हा आंनद प्रत्येकाने घेतला पाहिजे असे डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.

आपआपसातील मतभेद आता बाजूला ठेवा. सर्वांना एकत्र येवून काम करायचे आहे. हे लक्षात घ्या. आपण आठ तास काम करतो. त्यामध्ये हलगर्जीपण चालणार नाही. रुग्णालयात स्वच्छता राहिलीच पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क दिले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही. मात्र हक्कांचा गैरफायदाही कोणी घेवू नये असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.
परिचारिकांची संख्या अपूरी आहे. याची माहिती मी घेतली आहे. त्यासाठी मी पाठपूरावा करुन कर्मचारी संख्या कशी परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करेन, तो पर्यत आहे त्या कर्मचार्यांनी प्रसंगी जास्त वेळ काम करुन रुग्णसेवा द्यावी. त्यामध्ये खंड पडणार नाही. याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे असे डॉ. जगताप म्हणाले. यावेळी कार्यालय कर्मचार्यांनी डॉ. जगताप यांचे रुग्णालयात स्वागत केले.