डिसेंबरपर्यंत बहुतांश चौपदरीकरण पूर्ण होईल: ना. शिवेंद्रराजे भोसले

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर सर्व्हिस रोड, अंडरपास, ब्लॅकस्पॉट काढण्याच्या आवश्यकतेबाबत नवीन उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नवीन ज्याठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न असून दावे प्रलंबित आहेत. ते दावे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ठेकेदारांमधील वादात जर हा महामार्ग अडकणार असेल तर केंद्रीय मंत्री गडकरींना सांगून काम काढून घेतली जातील आणि जो करणार असेल त्याला काम देण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी ठेकेदारांना दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी सार्व. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी महाड आणि रत्नागिरीत अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संगमेश्वर येथे ट्रॅफिकजॅमचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असतो. याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर येथील दोन्ही पूल, भरावाची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. संगमेश्वरमध्ये ठेकेदारांमध्ये सामंजस्य दिसून येत नाही. त्यामुळेच काही प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत ठेकेदाराला दंडही ठोठावण्यास सुरुवात झालेली आहे. संबंधित अधिकार्‍यांना व ठेकेदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नसेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून त्यांच्याकडून काम काढून घेण्यात येईल असे बजावण्यात आले आहे. जो काम वेळेत करेल त्याला हे काम देण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.
महामार्गावर काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न आहे तर काही ठिकाणी अद्याप भूसंपादनाचे दावे प्रलंबित असल्याने त्यांचे पैसे दिले गेलेले नाहीत. जवळपास सातशे ते आठशे दावे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असून, प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दावे निकाली निघाल्यावर भूसंपादनाचे पैसे जमिन मालकांना दिले जातील, नव्याने पैसेही जाहीर केले जातील असे त्यांनी सांगितले.

गेली सतरा वर्ष महामार्गाचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील महामार्गाचे काम जवळपास डिसेंबरपयर्र्त पूर्ण होईल काही पुलांच्या कामाला थोडा वेळ लागेल. रायगडमध्ये माणगाव-इंदापूरचा प्रश्न असून त्याला आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गावर ज्याठिकाणी क्वॉलिटीचे काम होणार नाही त्याठिकाणी ठेकेदारांकडून दुरुस्ती करुन घेतली जाईल. नवीन महामार्गावर काही ब्लॅकस्पॉट काढण्यात आले आहेत. तेही काढण्याच्या व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी सर्व्हीस रोडचा प्रस्ताव नव्याने असून त्याची कामेही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असल्याचेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.


राज्यभरात ठेकेदारांची आतापर्यंत 9,500 कोटींची देणी देण्यात आली आहेत. उर्वरीत देणींसाठी अर्थ मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. त्यावरही स्वाक्षरी झाली असून, लवकरच ही देणी टप्प्याटप्प्याने दिली जाणार असल्याचेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.