झाडाला गळफास लावून प्रौढाची आत्महत्या

वेळणेश्वर येथील घटना

गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने काजूच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

​विठ्ठल उमलु चव्हाण (वय ४५, मूळ रा. बम्मण जोगी, सिंदगी, जि. विजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विठ्ठल हे सध्या गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील इंजिनिअरिंग कॉलेजसमोर वास्तव्यास होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. विठ्ठल चव्हाण यांनी वेळणेश्वर येथील एका माळरानावरील काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. सायंकाळच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली, तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठल चव्हाण यांनी दारूच्या नशेत असताना हे कृत्य केले असावे, असा संशय वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी गुहागर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.