रत्नागिरी:- शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 9 जणांना हा पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी विशेष पुरस्काराला मात्र कात्री लावण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून या पुरस्काराला वादाचे ग्रहण लागत होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून पुरस्कारामध्ये कोणताही अडथळा आला नाही. यावर्षीही हे पुरस्कार वेळेत जाहीर झाले आहेत.
या पुरस्कारासाठी जिल्हाभरातून 22 जणांनी प्रस्ताव दाखल केला होता. या सर्वजणांची गेल्या महिन्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. यानंतर त्या मंजुरीसाठी कोकण आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आल्या. गुरूवारी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण अधिकारी वामन जगदाळे, आर. के. कांबळे आदी उपस्थित होते.
पुरस्कार पुढीलप्रमाणे – पुंडलिक शिंदे (शिपोले, ता. मंडणगड), मुस्ताक तांबे (उर्दु शाळा विसापूर, दापोली), संतोष देवघरकर ( कर्जी, ता. खेड), प्रांजली चव्हाण (मांजरेकोंड, ता. चिपळूण), माधवी पाटील ( कुडली नं. 4, ता. गुहागर ), सुनील बोडेकर (हरपुडे नं. 2, ता. संगमेश्वर), दिलीप भांडावले (पावस नालेवठार, रत्नागिरी), मृगया मोरे(कस्तुरबा गांधी विद्यालय, लांजा, लक्ष्मण घाडीगावकर( सागवे कात्रादेवी, राजापूर ) यांचा समावेश आहे.
मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन लेखन व व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य, साक्षरता अभियाना शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन परिक्षा, शालेय कामाबाबत वरिष्ठांचा अभिप्राय, शैक्षणिक उठाव आदी मुद्द्यांचा विचार करून हे पुरस्कार देण्यात आले.