जिल्ह्यात 45 हजार पालकांकडून सुकन्या योजनेची खाती 

रत्नागिरी:- मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात तब्बल 45 हजार पालकांनी आपल्या मुलीचे नावे सुकन्या खाती काढली आहेत.

केंद्र सरकारच्या अनेक विभागांपैकी पोस्ट विभागानेही गेल्या काही वर्षात कार्पोरेट लूक पत्करला असून, नवनवीन योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत जाऊन विश्वास संपादन केला आहे. पोस्टाचे आता पोस्ट पेमेंट बँकेत रुपांतर झाले आहे. जिल्ह्यात सध्या विविध योजनांमध्ये तब्बल 8 लाख 52 हजार 998 एवढी खाती आहेत. त्यामध्ये पोस्टातर्फे मुलींसाठी राबवण्यात आलेल्या सुकन्या योजनेमध्ये तब्बल 45 हजारहून अधिक खाती कार्यरत आहेत.

जिल्ह्यात टपाल कार्यालयामार्फत गावागावांतून खाते उघडून मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, या साठी सरकारी पातळीवरुन अनेक योजना सुरू करण्यात आल्या, तर स्थानिक पातळीवरही काही संस्थांनी पुढाकार घेतला. सामाजिक मानसिकता लक्षात घेता मुलींचे शिक्षण आणि आथक सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती कमी झाल्याचे अजूनही दिसत नाही. मुलीला परक्याचे धन मानण्याच्या विचारातून मुलीला शिक्षण व आथक स्वावलंबनापासून दूरच ठेवले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू करुन दहा वर्षांपर्यंत वय असलेल्या मुलींच्या नावाने पालकांनी टपाल खाते उघडून एक हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत चौदा वर्षे रक्कम भरणा करायची आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलींच्या शिक्षणासाठी या गुंतवणुकीतून तिला व्याजासह अर्धी रक्कम मिळणार आहे.

पालकांनी केलेल्या या गुंतवणुकीमुळे मुलीला शिक्षणासाठी लागणारा पसा त्यातून उभा राहतो व तिचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित राहते, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे टपाल कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात आली. दि. 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ’आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत साजरा होत असलेल्या जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून  जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोस्टातर्फे करण्यात येत आहे.