जिल्ह्यात 14 गावातील 26 वाड्यांना पाणी टंचाईची झळ

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरु आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुसर्‍या बाजुला पाणीटंचाईनेसुद्धा डोके वर काढले आहे. भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस कमालीची घट होत असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामीण भागात सर्वांधिक फटका बसत असून, जिल्ह्यातील एकूण 14 गावांतील 26 वाड्यांमधील 9 हजार 882 ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात लांजा व चिपळूण या दोन तालुक्यातच पाणीटंचाईग्रस्त गावांचा समावेश होता. या दोन्ही तालुक्यातील 12 गावांतील 16 वाड्यांतील 8 हजार 670 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता उन्हाळ्याचा रखरखाट उग्र होत असताना खेड तालुक्यालाही या टंचाईची झळ बसू लागली आहे. तेथील टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. या टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासन स्तरावरून धावपळ सुरू झाली आहे.

जिल्हा प्रशासनस्तरावरून लांजा तालुक्यात पालू, चिंचुर्टी धावडेवाडीत 150, उंबरवणेवाडी येथे 85, हर्दखळे धनगरवाडी येथे 85, तर कोचरी ढोलमवाडी येथे 120 ग्रामस्थांना या टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या तालुक्यातील एकूण 3 गावांतील 5 वाड्यांतील 440 ग्रामस्थांना एका पाण्याच्या टँकरद्वारे आतापर्यंत 44 फेर्‍या पाणीपुरवठ्यासाठी मारण्यात आल्या आहेत.

चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईच्या समस्येने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. येथील 9 गावांतील 14 वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील 8 हजार 230 रहिवाशांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील कोंडमळा धनगरवाडी येथील 40 कुटुंबे, कादवड धनगरवाडी 1, धनगरवाडी 2 येथील 54 कुटुंबे, सावर्डे धनगरवाडी, बाजारपेठ येथील 4 हजार रहिवाशी, कुडुप धनरवाडी येथील 40, टेरव सुतारवाडी, तांबडवाडी येथील 3 हजार रहिवाशी, अडरे धनगरवाडी येथील 37, आगवे लिंबेवाडी, मधलीवाडी येथील 468, अनारी धनगवाडी येथील 349, डेरवण खालची बौद्धवाडी येथल 242 इतक्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
आता त्यामध्ये खेड तालुक्यातील देवसडे आणि दिवाणखवटी या गावांची भर पडली आहे. देवसडे येथील सावंतवाडीमधील 85 ग्रामस्थ, कदमवाडीतील 112 ग्रामस्थ, मधलीवाडीतील 145 ग्रामस्थ, जाधववाडीतील 178 ग्रामस्थ, बौध्दवाडीतील 100 ग्रामस्थ, वैरागवाडीतील 85 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. दिवाणखवटी येथील सातपानेवाडीतील 85 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही गावातील टंचाईग्रस्त वाड्यातील ग्रामस्थांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.