जिल्ह्यात ४५ तीव्र कुपोषित बालके; बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याच्या सूचना

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कुपोषित मुलांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. जिल्ह्यात ४५ तीव्र कुपोषित बालके असून त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी वर्षभरापासून ग्रामीण बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आलेली आहे. मुळात मातांना पूरक पोषण आहार मिळत नसल्यामुळे कुपोषणाचा विषय गंभीर बनला आहे.

जिल्ह्यात जून २०१२ अखेरपर्यंत ० ते ६ वर्षे वयोगटातील ७२ हजार ६९१ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ६६ हजार ६४९ बालके सर्वसाधारण वजनाची आणि मध्यम वजनाची ५ हजार ४३७ बालके आहेत. मध्यम कुपोषित बालकांची संख्या ५२३ असून तीव्र कुपोषित ४५ बालके आहेत. यामध्ये सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके लांजा तालुक्यातील आहेत. शासनाच्या बालविकास केंद्रांमार्फत या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना पोषक आहार दिला जातो. महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो; परंतु तीव्र कुपोषित बालकाची संख्या कमी झालेली नाही.

याबाबत काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता ते म्हणाले, बालविकास केंद्रांमार्फत बालकांबरोबर मातांनाही पूरक आहार उपलब्ध करून दिला जातो. या केंद्रांमध्ये कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर योग्य ते उपचार आणि सकस आहार दिला जात आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांवर लक्ष ठेवण्यात येते; मात्र मातांना पुरक पोषण आहार मिळत नसल्याने बालकांवर त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.