रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला मंगळवार दि. 4 मार्चपासून जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आता शिमगोत्सवाची धूम चांगलीच शिगेला पोहचली असून गुरुवारी शेवटचा होम पेटवण्यात आला. त्या नंतर शुक्रवारी ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिराबाहेर पडून त्या त्या ठिकाणच्या सहाणेवर दर्शनासाठी विराजमान झाल्या आहेत. होळीसाठी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहणारे चाकरमानी, भाविक मोठ्या संख्ये कोकणातील आपल्या गावी दाखल झाले आहेत. बुधवारी रंगपंचमीला रंग खेळल्यानंतर ग्रामदेवतांच्या पालख्या पुन्हा मंदिरात जाणार आहेत.
गेल्या मंगळवारी गाव वस्त्यांमधील मांडावर होळ्यांचे विधिवत पूजन आणि पहिला होम करण्यात आला. त्या नंतर ग्रामदेवतांच्या पालख्या सजून ग्रामदेवतांना रुपे लावण्यात आली होती. या वर्षी जिल्ह्यात 1399 पालख्या सजल्या असून 1315 सार्वजनिक ठिकाणी तर 2854 ठिकाणी खासगी होळ्या उभारण्यात आल्या होत्या.
मंगळवारी फाक पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करुन शिमगोत्सवाची सुरुवात झाली. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला गेला. 4 मार्च फाल्गुन पंचमी (फाक पंचमी)पासून या जल्लोषी उत्सावाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. आठ दिवसांनी गुरुवारी होळ्यांचा होम झाल्यानंतर शुक्रवारी ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीच्या मंदिराबाहेर सडामिर्या तसेच जाकीमिर्या येथील ग्रामदेवतांच्या पालख्यांसोबत भेट झाली. आता श्री देव भैरीची पालखी बुधवारपर्यंत सहाणेवर राहणार असून रंगपंचमीला रंग खेळून झाल्यानंतर ही पालखी पुन्हा रात्री उशिरा मंदिरात विसावणार आहे.