रत्नागिरी:- निवडणुकीच्या काळात किंवा जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची ड्युटी ही आता नवीन बाब राहिलेली नाही. परंतु, रत्नागिरी येथे मात्र कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांबाबत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये लावण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याबाबत पत्रक काढले आहे. यावरुन आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांच्या ड्युटी एसटी आगारात लावण्यात आल्या आहेत. या बाबत राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सदरचा निर्णय हा प्रांत आणि तहसीलदार यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असल्याचे सांगितले. दररोज केवळ तीन शिक्षक राजापूर एसटी आगारामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत असतील. एक शिक्षक रोज आठ तास ड्युटी करेल. त्यानंतर पुढील 13 दिवसांमध्ये त्याला अशा प्रकारचं काम लागणार नाही.
तसेच, सुट्टीसाठी जिल्हा बाहेर न गेलेले. शिवाय राजापूरपासून जवळच असलेल्या शिक्षकांची ड्युटी याठिकाणी लावण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षक आहेत. यापैकी 39 शिक्षकांची ड्युटी ही राजापूर आगार येथे लावण्यात आली आहे. यावर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबतचा ट्विट करत शिंदे सरकरावर निशाणा साधला आहे.
सत्यजित तांबे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे हे पत्रक ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापानाची व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध. बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत. शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे, अशा शब्दांत तांबेंनी दीपक केसरकरांवर निशाणा साधला आहे.