रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये या वर्षी मच्छिमार नौकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 654 ने वाढली आहे. त्याचबरोबर मच्छीमार सहकारी संस्थांमधली सभासद संख्या देखील 22 हजार 649 ने वाढली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मच्छीमार नौकांना मिळणारे मासळी उत्पादन सुद्धा 6641 मे. टनने वाढले आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी 2 हजार 520 मच्छिमार नौका होत्या. चालू वर्षी त्या नौका वाढून 3 हजार 174 इतक्या झाल्या आहेत. रत्नागिरीसह मंडणगड, दापोली, गुहागर, राजापूर या तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. मंडणगड तालुक्याला केवळ 20 कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला असल्याने या ठिकाणी मच्छीमार नौकांची आणि मासळी उतरविण्याच्या केंद्राची संख्याही कमीच आहे. मंडणगडात केवळ 20 नौका असून त्यातील 15 यांत्रिकी नौका आहेत.
गुहागरला 38 कि. मी. समुद्र किनारा लाभला असून 250 नौका असून त्यातील 175 यांत्रिकी नौका आहेत. दापोलीला 35 कि.मी.चा समुद्र किनारा असून 600 मच्छीमार नौका आहेत. त्यातील 525 यांत्रिकी नौका आहेत. राजापूरला 18 कि.मी.चा समुद्र किनारा असून या तालुक्यात 354 नौका असून, यातील 300 नौका यांत्रिकी नौका आहेत.
दरम्यान, यंदा नौकांचे प्रमाण वाढले असले तरी, मासळी मिळणे नशिबाचा भाग बनला आहे. सन 2022-23 मध्ये 62 हजार 717 मे. टन मासळी उत्पादन झाले होते. सन 2023-24 मध्ये हे उत्पादन वाढून 69 हजार 358 मे. टन इतके झाले आहे. जिल्ह्यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 1 ने वाढ झाली, त्याचवेळी सभासद संख्या मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 22 हजार 649 ने वाढली आहे.
सन 2022-23 मध्ये 85 सहकारी संस्थांमध्ये 41 हजार 40 सभासद होते. सन 2023-24 मध्ये सहकारी संस्थांची संख्या 86 झाली असून 63 हजार 689 इतके सभासद आहेत. त्यामुळे मच्छिमारांची संख्याही दरवर्षी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मच्छीमार नौका
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 हजार 174 मच्छीमार नौका आहेत, त्यातील 2 हजार 515 यांत्रिकी नौका आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांना समुद्र किनारा लाभला आहे. रत्नागिरी तालुक्याला सर्वाधिक 56 कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमार नौकांची संख्यासुद्धा इतर 4 तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रत्नागिरी तालुक्यात 1 हजार 950 नौका आहेत. यातील 1 हजार 500 नौका यांत्रिकी आहेत.