जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला; दापोलीत पारा 12.7 अंश सेल्सिअसवर 

रत्नागिरी:- पावसाने उघडीप दिल्यानंतर मागील आठवडाभरापासून कमाल-किमान तापमानात घसरण होत आहे. 23 डिसेंबरपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार रविवारी दापोलीत 12.7 अंश सेल्सिअस एवढी यंदाची निचांकी नोंद झाली आहे. थंडीचा आंनद घेण्यासाठी पर्यटकांकडूनही दापोलीत वास्तव्य आहे. जिल्ह्यात सगळीकडेच थंडी जाणवत असून ग्रामीण भाग धुक्यांनी व्यापलेला पहायला मिळत आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, हे थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. गेले तिन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातही हलके वारे वाहू लागले आहे. या वार्‍यांबरोबरच थंडीनेही प्रवेश केला असून त्याची तिव्रता दिवेसेंदिवस वाढतच जाणार आहे. बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंशांनी घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. कमाल तापमान 30 अंशापर्यंत होते. शुक्रवारपासून तापमानात घसरण सुरु झाली. रविवारी सर्वाधिक थंडी जाणवत असून दापोली तालुक्यात सर्वात कमी नोंद झाली आहे. 12.7 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान असल्यामुळे धुक्याच्या दुलई दापोलीवर पांघरल्यासारखं चित्र होतं. याच कालावधीत गतवर्षी कमाल 33.2 अंश सेल्सिअस तर किमान 14.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. संगमेश्‍वर, लांजा, गुहागरसह अन्य तालुक्यांच्या ग्रामीण भाग धुक्यातच होते. दिवसभर हलके गार वारे वाहत असल्यामुळे वातावरण थंडच होते. रविवार असल्यामुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केलं. तर सायंकाळी मांडवी, भाट्ये, आरे-वारे, गावखडी, मालगुंडसारख्या किनारी फिरण्याचा आनंद घेतला. कपाट टाकलेले गरम कपडे बाहेर पडू लागले आहेत. रात्री आणि सकाळी गावागावात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीचा कडाका पुढे वाढतच राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. थंडीमुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार वाढण्याची भिती असून त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांकडून काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, थंडीचा वाढता कडाका आंबा बागायतदारांसाठी दिलासादायक ठरत आहे. अवकाळीमुळे आंबा उत्पादनाच्या स्थितीवर साशंकता व्यक्त करणारा बागायतदाराला आशादायी चित्र दिसू लागले आहे. झाडांना लवकरच मोहोर येण्याची शक्यता आहे. तिसर्‍या टप्प्यातील मोहोर व्यवस्थित आला तर त्यामधून एप्रिलच्या अखेरीस तरी उत्पादन चांगलं येऊ शकते असा अंदाज बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.