जिल्ह्यात जोखीमग्रस्त 16 तर 206 नदीकाठची गावे

जिल्हा आरोग्य विभाग ; साथी नियंत्रणासाठी कृति आराखडा

रत्नागिरी:- पावसाळ्यात उद्भवणार्‍या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय पथक सज्ज ठेवले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जोखीमग्रस्त 16 गावे आणि नदीकाठची 206 गावे जाहीर करण्यात आली आहेत.

पावसाळ्यात साथ रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या जातात. 1 जून पासून या गावांवर आरोग्य विभागाने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात यापूर्वी उद्भवलेल्या साथग्रस्त गावांमध्ये जिल्हा आरोग्य विभाग अधिक लक्ष केंद्रीत करते. संभाव्य पुरग्रस्त जोखीमग्रस्त गावांच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मागील 5 वर्षात डेंग्यु, चिकुनगुन्या, गॅस्टो, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, ताप उद्रेक हिवताप , काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा झालेल्या गावांवर जिल्हा परिषद आरोग विभागातर्फे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गावांमध्ये पाथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षकांनी भेट देऊन साथरोग विषयक पाहणी केली आहे. या गावातील पाणी व टी.सी.एल. नमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर 24 तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली असून औषध साठा आणि इमर्जन्सी किट सज्ज ठेवले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेशही दिले गेले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी घरोघरी मेडिक्लोर वाटप व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.