रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर खाली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 236 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर केवळ 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या 308 वर पोचली आहे.
नव्याने सापडलेल्या 9 पैकी 9 रुग्णांनी अँटिजेन टेस्ट केली आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील 2, खेड 2 आणि रत्नागिरीतील 5 रुग्णांचा समावेश आहे. तर चिपळूण, राजापूर आणि गुहागर तालुक्यातील रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 242 वर पोचली आहे. तर सोमवारी तब्बल 236 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 45 हजार 979 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत 7 हजार 609 जणांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढून 92.31 टक्क्यांवर पोचला आहे. आता पर्यंत 305 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.73 टक्क्यांवर आहे.









