जिल्ह्यात कोरोनाचे सहा बाधित

आरोग्य यंत्रणा सतर्क ; तीन बाधितांना लक्षणे नाहीत

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे सहा बाधित असून त्यातील चार जण गृह विलगीकरणात तर 2 संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. 17) नोंद झालेल्या तिन बाधितांना लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही आरोग्य विभाग सतर्क असून कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे.

देशभरात कोरोनाचा साडेसातशेहून अधिक बाधित सापडले आहेत. त्यामुळे कोरोना पुन्हा शिरकाव करणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत. आरोग्य विभागानेही सतर्कता म्हणून कोरोनाची चाचणी करण्यावर भर दिला आहे. प्रसुतीसाठी येणार्‍या महिलांचीही तपासणी केली जाते. जिल्ह्यात आजपर्यंत 6 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यापैकी एक डेरवण येथे असून दुसरा मुंबईत केईएमला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. सात दिवसानंतर त्यांची तपासणी केली जाते. त्यात त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना सोडण्यात येणार आहे. कोरोनाचे बाधित वाढू नयेत यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.