रत्नागिरी:- आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच पालकांकडून सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा स्थिर असल्यामुळे भितीची छाया कायम आहे.
नववी व अकरावी हा दहावी व बारावीचा पाया असल्याने या वर्गातील मुलांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही अट महत्त्वपूर्ण असून, शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिवाय कोरोनाबाबतच्या शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नसलेल्या गावांतून शाळा सुरू होऊ शकत असल्या तरी पालकांमध्ये मात्र अद्याप भीतीसह, संभ्रमच आहे.
शासनाच्या अध्यादेशाबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांनीही पालकांच्या व्हॉटस्अप ग्रुपवर सूचना पाठविल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातून शासनाच्या सूचनेनुसार समिती गठित करून शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा ठराव मंजूर करणे गरजेचे असून, तो ठराव शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करायचा आहे. मात्र, अद्याप एकाही गावाने तसा ठराव केलेला नाही.
ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या सूचनेनुसार महत्त्वपूर्ण मंडळींची समिती गठित करून त्यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचनांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. सर्वानुमते निर्णय घेत तसा ठराव मंजूर करून पाठवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही योग्य खबरदारी आवश्यक आहे. – निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी









