रत्नागिरी:-कोकणात सोमवारपासून शिमगोत्सवाला सुरू वात होणार आहे. पारंपारिक पध्दतीने होळीचे पूजन करून या उत्सवाची सुरूवात होणार आहे. सर्व सामान्यांचा आवडता सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या सणात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा आदी विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत. रविवारी शिमगोत्सवासाठी होळी आणताना मोठा उत्साह होता.
येथील विविध गावांमध्ये पहिल्या होळीच्या दिवशी शेवरीचे झाड तोडून त्याची होळी उभी केली जाते. या होळीची पुढील १० ते १२ दिवस पूजा, आरती करून ती पेटवण्यात येते. शेवटची होळी म्हणजे होम पेटवण्याची प्रथा आहे. विविध गावांमध्ये शिमगोत्सवात वेगवेगळया प्रथा आहेत. या उत्सवात होळी पेटवण्यासाठी लहानांपासून मोठयांपर्यत सर्वाचा उत्साह दांडगा असतो. आपापसातील भांडण-तंटे मिटवून या सणात ग्रामस्थ एकत्र येत असतात. होळी पेटवत असताना मारण्यात येणाºया बोंबा किंवा फाका यांच्यामध्ये वैविध्य असते. विविध गावांमधील खेळे हे देखील प्रमुख आकर्षण असते. या खेळयांसोबत गावागावातील फिरणारे संकासूर लहानांपासून मोठयांपर्यत सर्वाचे मनोरंजन करतो. या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी गावागावातील खेळे अनवाणी फिरत असतात. आपल्या ग्रामदैवतेचे चिंतन हेच या प्रथा जपण्यास आपल्याला बळ देते, असे ग्रामस्थ सांगतात. होमात नवीन जोडप्यांनी नारळ टाकून पुढील संसारासाठी आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.
सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात शिमगोत्सवाला मोठया दिमाखात प्रारंभ होईल. होळी नेताना तरूणांसह ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय असतो. शिमगोत्सवातील पुढचा टप्पा म्हणजे सहाण भरण्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमात प्रत्येक गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या सहाणेवर आणल्या जातात. तेथे ग्रामस्थ त्या देवतांचे दर्शन घेतात. सहाण भरण्याच्या ठिकाणी गावागावांमध्ये जत्रेचे रूप आलेले असते. तेथे ढोलवादन, लाट फिरवणे आदी विविध परंपरा पाळल्या जातात. तसेच ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट हा देखील शिमगोत्सवातील महत्वाचा सोहळा आनंदाने पार पडतो.
सहाण भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गावागावांमधील ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी फिरवल्या जातात. या पालख्यांच्या पारंपारिक ठरलेल्या हद्दीत त्या फिरवल्या जातात. या कालावधीत मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी असलेले चाकरमानी गावांमध्ये येतात. या शिमगोत्सवात कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे वेगळे दर्शन होत असते. आजच्या महागाईच्या व धावपळीच्या जगातही शिमगोत्सवाची परंपरा मोठया आनंदाने साजरी करत कोकणाने आपले वेगळेपण जपले आहे.