जिल्ह्यातील 821 ग्रामपंचायतींना ‘चंदेरी’ कार्ड

रत्नागिरी:- जिल्ह्यात मान्सूनपूर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल 821 ग्रामपंचायती ‘चंदेरी’ कार्डच्या मानकरी ठरल्या आहेत. फक्त चारच ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड मिळाले आहे. विशेष म्हणजे 2012 पासून जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही.

जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचाच आधार घेत गुणवत्ता स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे वर्षातून दोनदा स्वच्छता सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात येते.

स्रोतांचे परिसर व व्यवस्थापनातील काही दोष आढळून येतात. त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीस प्रतिबंध करता येतो. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे, लाल आणि चंदेरी कार्ड वितरित करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी (मार्च ते मे) व पावसानंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) असे दोनदा जिल्ह्यातील पाणी स्रोतांची तपासणी होते.

या वर्षीची पाणी स्रोतांची तपासणी करण्यात आली. या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये 821 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड, चार पिवळे कार्ड देण्यात आले. विशेष म्हणजे 2012 पासून अद्याप एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. ही बाब जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.

लाल रंगाचे कार्ड : ज्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी शुद्धीकरण अनियमित होते, पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ आहे, टीसीएल पावडरचा पुरेसा वापर नाही, वर्षभरात जलजन्य साथीचा उद्रेक.
हिरवे कार्ड : परिसर एकदम स्वच्छ, शुद्धीकरण नियमित.
पिवळे कार्ड : ज्या गावांमध्ये अस्वच्छता आढळून येते.
चंदेरी कार्ड : दर पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेली गावे, पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेली गावे.