जिल्ह्यातील 27 पैकी 7 किल्ले राज्य संरंक्षित

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 27 किल्ल्यांपैकी पुरातत्त्व विभागामार्फत सात किल्‍ले संरंक्षित करण्यात आले असून, दोन किल्ल्यांचे संवर्धन काम हाती घेण्यात आले आहे. 5 कोटी खर्च करून पूर्णगड किल्ल्याचे काम पूर्ण झाले असून, बाणकोट किल्याचे काम सुरू आहे. अन्य दोन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू आहे.

जिल्ह्यात किल्ल्यांची पडझड सुरू झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने किल्ल्यांची तटबंदीपासून मूळढाचाही अनेक ठिकाणी ढासळला आहे. शासनाने आता किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर शासनाने जोर दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 27 किल्‍ले आहेत यातील खेड तालुक्यातील रसाळगड, मंडणगड तालुक्यातील बाणकोट, रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, राजापूर तालुक्यातील यशवंतगड, गुहागर तालुक्यातील गोपाळगड, दापोली तालुक्यातील गोवा किल्‍ला, संगमेश्‍वर तालुक्यातील महितपगड हे किल्‍ले पुरातत्व विभागाकडून संरंक्षित करण्यात आले आहेत.
रत्नागिरीतील पूर्णगड आणि बाणकोट तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतगड आणि भरतगड या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील पूर्णगड किल्ल्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, आता हा किल्‍ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
पुरातत्व विभागाकडून अन्य किल्ल्यांचीही पाहणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा येथील महिपतगड आणि दापोली गोवा किल्‍लाच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

सामाजिक दायित्व अंतर्गत लोकसहभागातुन गडकिल्यांची देखभाल करण्यासाठी पुरातत्व विभागाने पाऊले उचलली आहेत. यातून गडकिल्यांचे पावित्र्य जपण्याबरोबरच जतन, संवर्धन व संरक्षण करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दापोलीतील गोवा आणि रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्यांची देखभाल केली जाणार आहे. पुण्यातील दोन उद्योजकांना याची जबाबदारी स्वीकारली असून, किल्याच्या दररोजच्या देखभार दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.