जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना मिळणार ग्रीन, पर्यावरणपूरक इमारत 

रत्नागिरी:-बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून ग्रीन बिल्डींग आणि पर्यावरणपूरक बांधकाम असलेल्या नुतन इमारत बांधणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्याला निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामपंचायतीनेही स्वनिधीचा हिस्सा त्यात भरावयाचा आहे.

स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारती बांधण्यासाठी मातोश्री योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात येते. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या स्रोतांची मर्यादा विचारात घेऊन स्वतंत्र इमारत नसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास मान्यता दिली आहे. ही इमारत ग्रीन बिल्डींग संकल्पना अमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनःभरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन-सामुग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. इमारतीचे काम हाती घेतल्यापासून ते एक वर्षात पूर्ण होईल असे नियोजन करावयाचे आहे. त्याचा प्रगती अहवाल तिन महिन्यांनी शासना सादर करणे बंधनकारक केला आहे. यासाठी ग्रामसभेचा ठराव करुन बांधकाम मुल्यांनुसार ग्रामपचायतीने स्वनिधीतून हिस्सा भरावयाचा आहे. या मंजुरीनंतरच जिल्हा परिषदेने अंतिम मंजुरी द्यायची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला बारा लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

निवड झालेल्या ग्रामपंचायती

निवड झालेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे ः भोमडी, आपटी, उसगाव (दापोली), तळे, धामणदिवी, घाणेखुंट (खेड), पिंपळोली (मंडणगड), मुर्तवडे, नारदखेरकी, वैजी-रेहेळ, मांडकी, पिंपळी बुद्रुक, दळवटणे (चिपळूण), वाशीतर्फे संगमेश्‍वर, नांदळज (संगमेश्‍वर), वाकेड, भडे, कोर्ले, हर्दखळे (लांजा), वाडापेठ, देवीहसोळ, तारळ, कळसवली (राजापूर), मजगाव, कर्ला, साखरमोहल्ला (रत्नागिरी).