जिल्ह्यातील 24 हजार आंबा बागायतदार गतवर्षीच्या विमा परताव्यापासून वंचित

रत्नागिरी:- अंबीया बहरातील फळपिकांकरिता पिकविमा योजना पुढील आर्थीक वर्षासाठी जाहीर झाली असून त्यामध्ये आंबा, काजू चा समावेश आहे. याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. मागील वर्षांचा विमा परतावा जिल्ह्यातील 24 हजार बागायतदारांना मिळालेला नाही; मात्र नवीन विम्यासाठी हप्ता भरावा लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमाफत योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. शेतक-याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित कालावधीत फळबागांना विमा सरंक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतक-यांचा सहभाग ऐच्छिक आहे. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे. एका शेतक-याला अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 13 हजार 300 रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपाये व विमा हप्ता 5 हजार रुपये आहे. हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग आर्द्रता इ. माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जातात.