रत्नागिरी:- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे त्या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. राज्यातील ७ हजार ६७५ ग्रामपंचायतींमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामंपचायतींचा समावेश आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींपाठोपाठ ग्रामपंचायतींवरही प्रशासकीय राजवट राहणार असल्याने गावचा कारभार हा अधिकार्यांच्या हाती जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे तिन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक ते नियोजन निवडणुक आयोगाकडून केले जात आहे. ते पूर्ण होण्यापुर्वीच ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी जसा पुर्ण होत जाईल तसे तिथे प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ग्रामविकास विभागाला राज्य निवडणूक आयोगाने लिहिलेल्या पत्रात कोविडबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका टप्या-टप्याने घेण्यात येत आहेत. पुढील तिन महिन्यात जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार त्या ग्रामपंचायतींचवर प्रशासक नियुक्त करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार अधिकार्यांच्या हात जाणार आहे. अनेकवेळा ज्यांच्याकडे प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते, त्यांना आपले नियमित कामकाज करुन ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे लागत असते. परिणामी गावांचा विकासकामांचा ओघ कमी होत जातो. पुढील तिन महिन्यात जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचातींच्या एक तृतीयांश ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवला जाणार असल्याने तेथील कामांना ब्रेक लागू शकतो.