जिल्ह्यातील 137 कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज

१९ मे पासून प्रवेश प्रक्रिया; एकाच अर्जावर राज्यात कुठेही प्रवेश

रत्नागिरी:- इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला दि. 19 मेपासून सुरुवात होणार असून, यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत काहीसा बदल करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीचा ठरणार आहे. याशिवाय विद्यार्थीसंख्या आणि जागांची उपलब्धता याचाही त्यात ताळमेळ साधला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 137 कनिष्ठाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज झाली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील 167 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 30 कनिष्ठ महाविद्यालय हे सीबीएससी, सैनिक शाळा, समाजकल्याण शाळा, 11 वी वर्ग अजून सुरू नसलेले व बंद असलेले कनिष्ठ महाविद्यालय वगळून 137 कनिष्ठ महाविद्यालये असल्यो माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा राज्यभर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे. पूर्वी मर्यादित ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात असे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आवडीचे महाविद्यालय घरबसल्या निवडता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा यापूर्वीचा अनुभव पाहता, दरवर्षी तारीख पे तारीख करून प्रवेश प्रक्रिया लांबविली जात असे. अर्धे वर्ष संपले तरी प्रवेश दिले जाई. आता मात्र 11 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, प्रवेशाचे सर्व टप्पे 15 ऑगस्टपर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत. यात पालकांसह विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे संकेतस्थळ आणि 8530955564 हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.

कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात घरी बसून घेता येणार प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कातही कपात केली असून, आता केवळ शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी यासाठी उर्वरित विभागांत 125 रुपये, तर मुंबईसाठी 225 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. तसेच महाविद्यालयांकडून घेतली जाणारी माहिती पुस्तिका फी, प्रवेशासाठीच्या शिफारसी या प्रकारांनाही ब्रेक लागेल. यामुळे पालक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्यासाठी लागणाऱया वेळ आणि पैशाचीही बचत होईल.

जिल्हापातळीवर आता नोडल ऑफिसर
अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

अनधिकृत महाविद्यालये ‘आऊट‘
महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागणार आहे. यामुळे मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरीत्या अकरावी-बारावीला प्रवेश देणाऱ्या संस्थांना आळा बसणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

संकेतस्थळात बदल
यापूर्वी क्षेत्रनिहाय संकेतस्थळ उपलब्ध होते. परंतु, यंदाच्या वर्षी अकरावीचे प्रवेश संकेतस्थळावरून पार पडणार आहे. केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाचे राज्यभरातील महाविद्यालयांचे पर्याय एकाच अर्जामध्ये नोंदविता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार असल्याची घोषणा शिक्षण विभागाने शुक्रवारी (दि. 9) प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे.

अनधिकृत संकेतस्थळांवर विश्वास न ठेवण्यो आवाहन
सन 2025-26 पासून संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. प्रवेश प्रक्रिये संदर्भातील सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था/विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन यांना कळविण्यात येते की, इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अनधिकृत संकेतस्थळे (वेवसाइट) व इतर सोशल मिडिया (डिजिटल माध्यमां) द्वारे माहिती प्रसारित होत आहे. अनधिकृत संकेतस्थळ / डिजिटल माध्यमद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा त्याआधारे प्रवेश प्रक्रिया करु नये. प्रवेशासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रवेश प्रक्रियेची माहिती हीच अधिकृत व विश्वासार्ह असल्यो सांगण्यात आले आहे.