जिल्ह्यातील १६ पोलीस चेक पोस्ट तात्पुरते बंद

कमी मनुष्य बळामुळे निर्णय; आलटून पालटून राहणार सुरू 

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलावर कमी मनुष्यबळामुळे प्रचंड ताण पडत आहे. त्यात सुमारे ४० कर्मचारी जिल्ह्यातील १६ चेक पोस्टवर (तपासणी नाके) विनाकारण गुंतुन राहतात. पोलिस दलाच्या कामकाजामध्ये त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणून जिल्ह्यातील १६ चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस दलाने घेतला आहे. परंतु हे तपासणी नाके कायमचे बंद न ठेवता आलटुन पालटुन
अचानक सुरू करून तपासणी केली जाणार आहे. अचानक तपासणीमुळे गुन्हे उकलण्याच्यादृष्टीने दलाला चागलाच फायदा होणार आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा पोलिस दलाची संख्या फार कमी आहे. सतरा लाखाच्या वर लोकसंख्या असली तरी पोलिस दलाची संख्या सोळाशे देखील नाही. सुमारे १ हजार १०० लोकांमागे १ पोलिस कर्मचारी, अशी पोलिस दलाच्या मनुष्यबळाची स्थिती आहे. त्यात मोर्चे, बंदोबस्त, आंदोलन, त्यात गुन्हे तपास, आदीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची विभागणी होते. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कर्मचाऱ्यांना १२ ते २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यास सागरी सुरक्षेच्यादृष्टीने आणि महत्त्वच्या ठिकाणी जिल्ह्यातत १६ चेक पोस्ट आहेत. या तपासणी नाक्यावर दोन्ही पाळ्यांमध्ये दोन ते चार कर्मचारी कार्यरत असतात.  वाढते गुन्हे आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर तपासणी नाक्यावर गुंतुण राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ड्युटी नेमुन दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १६ चेक पोस्ट सध्या बंद आहेत. भाट्ये, जयगड, चाफे, गणपतीपुळे, नाटे, रायपाटण, लांजा, ग्रामीण, गुहागर, दभोळ, लाटघर, पेढे आदी तपासणी नाक्यांचा समावेश आहे.

यामुळे पोलिस दलाला आणखी ४० कर्मचरी मिळाल्याने काहीसा कामाचा भार हलका झाला आहे. परंतु या बंद केलेले चेकपोस्ट कायमचे बंद करण्यात आलेले नाहीत. अचानक हे तपासणी नाके कधीही सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजेला हे तपासणी नाके सुरू राहणार आहेत. अचानक तपासनी नाके सुरू करण्यात येणार असल्याने गाफिल असलेले गुन्हेगार यामध्ये अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.

भाट्ये चेक पोस्ट लवकरच सुरू

बंद असलेले भाटये चेक पोस्ट सुरू होण्याची गरज आहे. किनारी भागातील तपासणी नाका महत्त्वाचा आहे. त्यात भाट्ये पर्यटन स्थल आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक गरज आहे. तपासणी नाका सुरू होता तेव्हा काही प्रमाणात वचक होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक लवकरच हा तपासणी नाका सुरू करण्याच्या मानसिकतेत आहेत.