रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या १७४ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रांत आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू राहील. या काळात शासकीय योजनांच्या घोषणा किंवा मतदारांवर प्रभाव पाडणारे कोणतेही काम करता येणार नाही. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. रिक्त जागांवर आपल्या पक्षाचा किंवा पॅनेलचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.









