जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 728 कोटीचे कर्ज वाटप

खरिपासाठी ५०७ कोटी, तर रब्बीसाठी २२१ कोटी वितरित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे तर २२१ कोटी रब्ब्बी पीक कर्जाचे वाटप केले आहे. रब्बी आणि खरीप पीक कर्जाचे एकूण ७२८.१५ लाख रूपयांचे (८४ टक्के) वाटप करण्यात आले आहे. खरीप पीक कर्जाचे तब्बल १०६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

खरीप पीक कर्ज वाटप १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या मुदतीत केले जाते तर ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत रब्बी पीक कर्ज वाटप केले जाते. खरिपामध्ये भातासाठी ४७५ रुपये प्रतिगुंठा, तसेच नाचणी पिकासाठी २१० रुपये प्रतिगुंठा असे कर्ज वाटप केले जाते. रब्बी पीक कर्ज योजनेत आंब्यासाठी २००० रुपये, काजूसाठी ६०० रुपये नारळासाठी ४९५ रुपये प्रति झाड़ असे कर्ज वाटप केले जाते.

गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये खरीप पिकाचे ४८२ कोटी ११ लाख ७० रुपये एवढे वाटप करण्यात आले तर रब्बी पिकाचे १६८ कोटी ५ लाख ६४ हजार रुपयांचे कर्जवाटप झाले. दोन्ही मिळून ६५० कोटी १७ लाख ३४ हजार (७५.४५ टक्के) एवढे कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. २०२४-२५ या कालावधीत जिल्ह्यात खरीप पीक कर्ज योजनेअंतर्गत तब्बल ५०६ कोटी ८१ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहेत.