रत्नागिरी:- संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातही एकही बाधित गेल्या दोन दिसात नोंदला गेलेला नाही. परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणार्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश दिले आहेत. रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तिसर्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.