रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. ताणतणाव, नैराश्य, क्षुल्लक कारणावरून वाद, राग यामुळे जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर 2022 या दोन महिन्याच्या कालावधीत २२ आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्येमध्ये सर्वांत जास्त तरुण असल्याने ही बाब अधिक काळजी वाटणारी आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गेल्या तीन महिन्यांतील आत्महत्यांचा आढावा घेऊन त्याची कारणमीमांसा केली जाणार आहे.
मानसोपचारतज्ञांना घेऊन सर्व विभागाला घेऊन याबाबत बैठक घेऊन काय निर्णय घेता येईल यावर पोलिसदलाचा विचार सुरू आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सलग आत्महत्या होण्याचे प्रमाण यापूर्वी नव्हते; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये मन सुन्न करणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या आहेत. जीवन एवढे स्वस्त झाले आहे का? असा विचार करायला लावणाऱ्या या घटना आहेत.
रत्नागिरी तालुक्यात स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या करण्याचे धाडस काही तरुणांनी दाखवले. एक दोन नव्हे तर अशा तीन घटना घडल्या. रेल्वेच्या धडकेत शरीर छिन्नविछिन्न होणार याची कल्पना असतानाही तरुण हे धाडस करत आहेत. रत्नागिरी तालुक्यातच दोन महिन्यात १४ जणांनी आत्महत्या केल्याची नोंदी आहे तर खेड, गुहागर, दापोली तालुक्यात ७ अशा एकूण २२ आत्महत्या झाल्या आहेत. २२ आत्महत्यांमध्ये १० जण २० ते ३४ वयोगटातील आहेत. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील काजल कृष्णा बेगडा (व २६) या विवाहितेने पती रागवल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तशी नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
या दोन महिन्यात आत्महत्या करणाऱ्यांची पोलिस ठाण्यात झालेली नोंद अशी, दापोलीत ८ सप्टेंबरला महेश भांबुरे यांनी कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवले. याच दिवशी रत्नागिरीतील शांताराम भागोजी कोकरे (नाखरे धनगरवाडी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. खेडमध्ये ९ सप्टेंबरला विशाल कृष्णा नायनाक याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दापोलीत याच दिवशी सागर देसाई यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. खेडमध्ये ओंकार नामक व्यक्तीने आत्महत्या केली. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलिसदलाने अन्य खात्यांना हाताशी धरून प्रयत्न सुरू केला आहे.









