जिल्ह्यातील तपासण्यात आलेल्या पाणी नमुण्यांपैकी १.४८ टक्के पाणी नमूने दूषित

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ९४४ पाणी नमुन्यांपैकी १४ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १.४८ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये चार तालुक्यांतील पाण्याचा एकही नमुना दूषित नसल्याचे आढळून आले.

रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार कुठेही पसरलेले आढळून येत नाही. कारण जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून टी. सी. एल. पावडर देण्यात येते. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी स्रोतांचे नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते. नमुना दूषित आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करतात. जिल्ह्यातील दापोली, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये एकही नमुना दूषित नाही. जिल्ह्यातील गोळा केलेल्या ९४४ पाणी नमुन्यांपैकी १४ नमुने दूषित आढळून आले. दूषित पाण्यामुळे अतिसार, कॉलरा, विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, आमांश, पोलिओ, खरुज असे विविध आजार होतात. त्यामुळे स्वच्छ पाणी वापरल्यास आरोग्य चांगले राहते. दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन वेगवेगळे आजार होतात. पाण्याचा अति उपसा, कारखान्यातील पाणी प्रक्रिया न करता सोडणे, घरगुती घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ पदार्थ जमिनीवर टाकणे व पुरणे, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, उघड्यावरील विष्ठा ही पाणी दूषित होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी टी.सी.एल. पावडरचा उपयोग करण्यात येतो. पाण्याची दोन प्रकारे तपासणी करण्यात येते, त्यामध्ये जैविक, रासायनिक तपासणी केली जाते. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी प्यावे, पाणी उकळून प्यावे, मेडिक्लोअरचा वापर करावा, पाणी फिल्टर करून पिणे गरजेचे आहे.