जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्णांमध्ये दुप्पटीने वाढ

साथी, मोफत आरोग्यसेवा ; डेंग्यूत वाढ, डोळ्याची साथ नियंत्रणात

रत्नागिरी:- गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव वाढल्याचे दिसत आहे. या महिन्यात डेंग्यूचे ३५ रुग्ण सापडले असून, जिल्हा रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. डोळ्याच्या साथीचा फैलाव थांबला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. साथीचे आजार, मोफत उपचारांची शासनाने केलेली घोषणा आदींमुळे जिल्हा रुग्णालयात बाह्य रूग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाली आहे. काही वॉर्डांमध्ये रुग्णांना बेड अभावी जमिनीवर झोपवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दररोज २५० ते ३०० बाह्यरुग्ण तपासणी होत होती; परंतु आता ही संख्या दुप्पट झाली असून ती ७०० वर गेली आहे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आल्याने खाटा कमी पडत आहेत. रुग्णांना खाली गाद्या टाकून सेवा दिली जात आहे. पावसाळी हंगामामुळे साथीच्या रोगांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात डासांमुळे फैलावणाऱ्या डेंग्यूच्या साथीचा फैलाव वाढला आहे. जूनमध्ये तपासलेल्या एकूण रुग्णांपैकी १७ डेंग्यूचे रुग्ण सापडले. जुलैमध्ये १० तर ऑगस्ट महिन्यात ३५ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन पाणी साठवून ठेवू नये. त्यामुळे डासांच्या अळ्या होण्याची शक्य आहे. यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारखा साथीचा फैलाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळा आणि स्वच्छता ठेवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.

गेली दोन महिने डोळ्याच्या साथीचाही प्रसार झाला आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी सुमारे ३०० रुग्ण दाखल झाले होते. हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. अशा रुग्णांना एका बाजूला राहण्यास सांगितले होते. त्यामुळे हळुहळू या रोगाचा फैलाव कमी झाला आहे; मात्र जिल्हा रुग्णालयाची बाह्यरुग्ण तापसणी वाढली आहे. ऑगस्टपासून शासनाने संपूर्ण राज्यात शासकीय रुग्णालयात सर्वांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित राबवल्या असल्याचे परिपत्रक काढले आहे. सर्व रेशनकार्डधारकांना या दोन्ही योजनांची संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. ५ लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियांसह मोफत उपचाराची घोषणा शासनाने केल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.