रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी महत्त्वाची निवड प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने ही निवड पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून, प्रशासकीय स्तरावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ३४ व्या अध्यक्ष म्हणून अस्मिता अनंत केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. अस्मिता केंद्रे यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवल्याचे मानले जात आहे. १९८७ पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या केंद्रे यांनी यापूर्वी मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडाचे सदस्यत्व आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व वित्त समितीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. 2026 च्या निवडणुकीत भिंगळोली मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, उपाध्यक्ष पदासाठी विलास चाळके यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्यांचेही नाव निश्चित मानले जात आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर ‘जयेश मंगल पार्क ‘ येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, राज्य मंत्री योगेश कदम आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.
जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता उरली असून, या निमित्ताने शिवसेना जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा होण्याची शक्यता आहे.









