61 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
रत्नागिरी:- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ च्या जयघोषात आणि ‘गणपती बाप्पा मोरया‘चा निनाद करत रत्नागिरीकरांनी जिल्हाभरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. शहरासह ग्रामीण भागातही अनंत चतुर्दशीचा उत्साह ओसंडून वाहत होता. 36,405 घरगुती आणि 61 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळपासूनच जिल्हाभरात शहरांसह गावागावात वातावरण भक्तिमय आणि जल्लोषी बनले होते. विविध भागांतून गणेश मंडळांच्या मिरवणुका दुपारनंतर वाजत-गाजत निघाल्या होत्या. सायंकाळी तर या विसर्जनाचा जल्लोष अधिकच शिगेला पोहचला होता. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया‘चा जयघोष करत मिरवणुकांमध्ये तरुणाई उत्साहात नाचत होती. बाप्पाच्या मूर्तीला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाप्पाला निरोप देत असल्यामुळे त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची भावुकपणाची झलक दिसत होती.
गावागावात तर घरगुती गणपती विसर्जनासाठी अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे मिरवणुका काढल्या. लहान मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळेच या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. बाप्पाला निरोप देताना कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ही आर्त हाक देत त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाच्या या रंगलेल्या माहोलात बाप्पावर होणारा फुलांचा वर्षाव, उधळला जाणारा गुलाल, कागदी फटाके या रंगांमध्ये विसर्जनाचा आनंद द्विगुणीत झाला होता.
रत्नागिरी शहर व परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यत गणेश मंडळे व घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणूका सुरू होत्या. त्यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, तसेच जीवरक्षक, सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. दुपारनंतर गणेशमंडळांच्या मिरवणूका विसर्जन मार्गावर येण्यास सुरूवात झाली होती. प्रत्येक मूर्ती कॅमेर्यात कैद करण्याचा प्रयत्न, प्रत्येक क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याचा आटापिटाही गणेशभक्त, नागरिकांकडून सुरु होता. हे सारे रंग पाहण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा, मांडवीत भक्तांगणांनी मोठी गर्दी केली होती. कमांडो, राज्यभरातून आलेला पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षारक्षक, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि शिस्तबद्ध विसर्जनासाठी प्रयत्नशील कार्यकर्ते यांच्या मदतीने विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
पोलिसांनी लोकांना समुद्राच्या खोल पाण्यात, तसा ग्रामीण भागातही नदी किंवा तलावांमध्ये न उतरता सुरक्षितपणे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच, विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनानेही स्वच्छतेची आणि इतर सोयी-सुविधांची योग्य व्यवस्था केली होती.









