जिल्हाभरात आज एक लाख बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती तर १६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे. पोलिस दलातर्फे समुद्र किनार्‍यावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोस्त ठेवण्यात येणार आहे.

गणेश चतुर्थीला जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४१७ घरगुती गणरायाचे आगमन झाले असून १२६ सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार ८४४ घरगुती तर सात सार्वजनिक दीड दिवसांच्या गणरायाचे निरोप देण्यात आला
जिल्ह्यात यावर्षी २७ ऑगस्टला गणपती बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. त्यानंतर दीड दिवसाच्या १३ हजार ८४४ गणपतीचे विसर्जन झाले. यानंतर आता गौरी गणपती विसर्जन आज (मंगळवारी ) करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील भाट्ये व मांडवी किनारी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा पाणवठ्यावर विसर्जन होते. यापुर्वीचे विसर्जन नागरिकांनी शांततेत केले. जिल्ह्यात आज १ लाख १ हजार ३२९ गौरीगणपतीचे तर १६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन थाटात होणार आहे. पाच दिवस मंगलमय वातावरणात गणेशाची पुजा-अर्चा झाली. ग्रामीण भागात आरत्या, भजनांसह विविध कार्यक्रमही झाले. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आज नदी किनारी-पाणवठ्यावर घरगुती तर समुद्रकिनार्‍यावर सार्वजनिक गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे.

पाणवठ्यावर अथवा रस्त्यावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात पोलिस पाटलांनाही सुचना देऊन प्रशासनाने योग्य नियाजन केले आहे. गर्दी टाळण्यासाठी गाडीबरोबर असलेल्या गणेशभक्तांना किनार्‍यावर सोडण्यात येणार असल्याचे आदेश यापुर्वीच भक्तगणांना देण्यात आले आहेत. येथील मांडवी चौपाटीकडे जाणार्‍या चौकातच बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे कलश उभारण्यात आले आहे. तसेच पालिकेकडून गणेशमुर्ती संकलनासाठी एक गाडीही ठेवण्यात आली आहे. मांडवी किनारी चार रस्त्यावर पहिला पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यानंतर मांडवी नाक्यावर पोलिसांचा ताफा असणार असून किनाऱ्यावर पोलिसांच्या पथकाची नजर असणार आहे.