जलजीवन मिशनमधून मिळणार शाळांना नळ जोडणी 

रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 317 शाळांपैकी 288 शाळांना नळ जोडण्या आहेत. अजुनही 28 शाळांमध्ये नळ जोडणी नाहीत. त्या शाळांना जलजीवन मिशन मधून जोडण्या देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील घरात नळ जोडणी दिली जाणार असून तसे न केल्यास ग्रामपंचायतीला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

‘जल जीवन’ मिशन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावोगावी 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी दिली जाणार आहे. ‘जल जीवन मिशन’ योजनेंच्या अंमलबजावणीसाठी पाणीपुरवठा विभागाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी कालबध्द कार्यक्रम आखला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तालुकानिहाय योजनांबाबत स्वतंत्र यादी निश्चित केली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची मान्यता घेतल्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत जिह्यातील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत योजनांची यादी सादर केली जाणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास 3 वर्षे व 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. या योजनांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करावेत असे आदेश शासनाने दिले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतस्तरावर 10 टक्के लोक वर्गणीची अट आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरा नळ जोडणी हा उद्देश आहे. रत्नागिरी तालुक्यात अजूनही ग्रामपंचायतस्तरावर 26 हजार नळ जोडण्या देणे शिल्लक आहेत. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पायपीट करुन मुलांनाच पाणी आणावे लागते. त्या शाळांमध्ये जलजीवन मिशनमधूनच पाणी दिले जाणार आहे. 15 जानेवारी 2021 पर्यंत यादीमधील पाणी योजनांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक मुख्य अभियंता यांच्यास्तरावर तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय मान्यता घेवून 31 मार्चपर्यंत योजनांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उपाध्ये यांनी दिली.