गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साठरे ग्रा. पं. चे नियोजन
रत्नागिरी:-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या काळात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने तालुक्यातील साठरे ग्रामपंचायतीने काही विशेष खबरदारीच्या सूचना जाहीर केल्या आहेत. यात मुख्यत्वेकरून गणेशोत्सवासाठी 5 ऑगस्ट पूर्वीच गावात या 14 दिवस क्वारंटाईन करा अशी विनंती ग्रामपंचायतीचे सरपंच वामन भिकाजी कांबळे वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ग्रामपंचायतींनी खबरदारीच्या सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत. आगामी गणेशोत्सवानिमित्त साठरे ग्रामपंचायतीने मुंबईहून येणारे चाकरमानी तसेच अन्य शहरातून येणारे ग्रामस्थ यांच्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. येणारे चाकरमानी नातेवाईक यांनी दिनांक ५ ऑगस्ट पूर्वी गावी येण्याचे नियोजन करावे. येतेवेळी जर पास आवश्यक असेल तर पास काढून येण्याचे निश्चित करावे. कोरोना विषाणू आजार संदर्भात सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवसांचा अलगीकरण कालावधी आहे. त्यामुळे गावी आल्यानंतर आपल्या गावच्या घरामध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल असे नियोजन करून गावी येण्याचा निर्णय घ्यावा. गावी आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने स्वगृह अलगीकरण तसेच आवश्यक आणि शक्य असल्यास संस्थात्मक अलगीकरण करण्यात येईल. उत्सव कालावधीत गावात वाडीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सत्यनारायण पूजा यासारखे अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उत्सव कालावधीत वाडी मध्ये आरती, भजन एकत्र येऊन करावयाचे अन्य कार्यक्रम करू नयेत. आरती मर्यादित स्वरुपात सामजिक अंतर ठेऊन घरगुती स्वरुपात करावी याला सार्वजनिक स्वरूप देऊ नये. गौरी गणपती निमित्त होणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत. श्रींचे आगमन तसेच विसर्जन या करता मिरवणुकांचे आयोजन करू नये. श्रींचा उत्सव घरगुती स्वरुपात साजरा केला जावा याकरिता उत्सवाचे स्वरूप निश्चित करावे. उत्सव कालावधीत सांस्कृतिक मनोरंजनपर कार्यक्रम करु नयेत. अंधश्रद्धा तसेच अफवा यावर विश्वास न ठेवता श्रद्धापूर्वक प्रातिनिधिक स्वरुपात उत्सव साजरा करावा. मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. मास्क न वापरता घराबाहेर पडल्यास रुपये 500 दंड आकारला जाईल अशा सुचना साठरे ग्रामपंचायतीने जाहीर केल्या आहेत. नियमांचे पालन करणे आवश्यक असून समाजाच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही या करिता सर्व ग्रामस्थांनी काळजी घेऊन ग्रामपंचायत साठरेला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामसेवक श्री पी,एस, भुतेकर, उपसरपंच विजय अनंत बारगुडे यांनी केले आहे.