ग्रामपंचायतींचा कारभार ३ दिवस राहणार ठप्प

रत्नागिरी:- सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या कालावधीत जिल्हयातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित सर्व संघटनानी एकत्रित घेतला आहे. राज्यातील एकूण २७ हजार ८६९ ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे.

राज्यातील सर्वच ग्रामपंचायती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे. ग्रामपंचायत कराची वसुली परिणामकारक होण्यासाठी या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा. आमदार निधी प्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना निधी राज्यस्तरावरूण देण्यात यावा. ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे व त्यात भरीव वाढ करण्यात यावी. विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीत स्थान असावे, टोल माफी मिळावी इत्यादी मागण्यासाठी हा तीन दिवसाचा काम बंद संप पुकारण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे महत्वपूर्ण मागण्या प्रलंबीत आहेत. याकडे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने न्याय मागण्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांनी तीन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.