गोळपमधील बंडखोरीचा निकालानंतर फैसला होणारच: बंड्या साळवी 

रत्नागिरी:-ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण माघारीनंतर चांगलेच तापू लागले आहे. तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली असताना माजी सभापतीने पक्षाविरोधात दंड थोपटून स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. मात्र पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करा. काही बंडखोर शिवसेनेचे नाव वापरून निवडणूक लढत आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणारच; मात्र निकालानंतर बंडखोरांना योग्य जागा दाखवली जाईल, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी दिला. 

गोळप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून ती अनेक वर्षे सेनेच्या ताब्यात आहे; मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेमध्येच बंडखोरी झाल्याचे पुढे आले आहे. पंधरा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीमध्ये शिवसेनेने प्रभाग 1 मध्ये जिगरमिया पावसकर, फैजान मुसुरमुल्ला, डॉ. फणसोपकर मॅडम. प्रभाग 2 जयवंद कीर, प्रियांका सुर्वे, रुणाली रायडे. प्रभाग 3 संदीप तोडणकर, समिक्षा शेडगे, प्रिया राडये. प्रभाग 4 मध्ये प्रदीप डोंगरे, अनिल संते, निहा साळवी. प्रभाग 5 मध्ये वैभव वारिसे, वृषाली पालकर, मिताली भाटकर या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे; मात्र माजी पंचायत समिती सभापतींनी तेथे बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न झाला आहे.
याला उत्तर देताना आमदार उदय सामंत आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आवाहन केले आहे की, बंडखोर उमेदवारांनी प्रचार करताना शिवसेनेचा उमेदवार असल्याची बतावणी करत आहेत. शिवसेनेचा वापर करून घाणेरडे राजकारण तेथे सुरू आहे. परंतु शिवसेना तळागाळात रुजली आहे. तेथे शिवसेनेच्या अधिकृत उमेवारांनाच मतदान होणार याची खात्री आहे. गोळप ग्रामपंचायतीवर 18 तारखेला शिवसेनेचाच झेंडा फडकणार आहे. त्यानंतर या बंडखोरांचे काय करायचे, ते पक्ष ठरविणारच आहे, असे या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.