गवळीवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा, दत्तमंदिराजवळ येथे बुधवारी २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. जेवण करून घे असा तगादा लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून प्रदीप प्रकाश रजपूत (वय ४०) या तरुणाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही घटना दिनांक २४/०९/२०२५ रोजी सुमारास रजपूत यांच्या घर नं. ११६८ मध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रदीप रजपूत हे घरात असताना, त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी आधी जेवण करून घे, त्यानंतर तुला काय करायचे ते कर असे बोलले. या गोष्टीचा राग प्रदीप यांच्या मनात इतका वाढला की त्यांनी रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. प्रदीप रजपूत यांनी घरातील हॉलमधील लाकडी वाशाला फॅन लावण्यासाठी असलेल्या हुकला घरात वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या साडीचा मध्यभाग वापरून गळफास लावला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना लगेच गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. त्यावेळी त्यांच्या हृदयाची धडधड अत्यंत कमी जाणवत असल्याने, नातेवाईक, शेजारी आणि पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती प्रदीप रजपूत यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आमृ. क्र. ९८/२०२५ अन्वये बी.एन.एस.एस. (भारतीय न्याय संहिता) कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, एका साध्या गोष्टीवरून घडलेल्या या आत्महत्येमुळे गवळीवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.