रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामकृती व वाडीकृती दलाची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये गणपतीपुळे गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने रविवारी (ता. 25) सकाळी 6 ते 30 एप्रिल रात्री 9 वाजेपर्यंत गणपतीपुळे गावात पूर्णतः टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणपतीपुळे हे प्रसिद्ध देवस्थान व नावाजलेले पर्यटनस्थळ आहे. सध्या संचारबंदीमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. तरीही दुसर्या लाटेचा प्रभाव गणपतीपुळे परिसरात दिसू लागला आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने सुरक्षिततेसाठी पाऊ उचलले आहेत. गावामध्ये कडक टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. असा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे.
गणपतीपुळेपासून काही अंतरावर जयगडजवळ खासगी प्रकल्प असल्यामुळे तेथील कामगारांचे वास्तव्य असते. त्याचा परिणामही येथे होण्याची दाट शक्यता आहे. टाळेबंदीसंदर्भात गणपतीपुळे ग्रामकृती व वाडीकृती दलाची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कडक निर्बंधांवर चर्चा करण्यात आली. 25 ते 30 एप्रिल या कालावधीत निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. त्यावेळी वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, विनाकारण व विनामास्क फिरणार्यांवर 500 रुपये दंड आकारला जाईल. गावाबाहेरील व्यक्तींना आठ दिवसाच्या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही. आपटा तिठा, श्री चंडिकादेवी मंदिर व मानेवाडी नवी विहीर येथे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. बांधकाम विषयक कामे सुरु असल्यास कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी केली जाणार आहे. तसे न केल्यास ती कामे टाळेबंदीच्या कालावधी बंद ठेवण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनच्या अमंलबजावणीपुर्वी दोन दिवस भाजीपाला, धान्य खरेदीसाठी लोकांना ठेवण्यात आले आहेत. गणपतीपुळे परिसरातील देवस्थान, एमटीडीसीच्या कर्मचार्यांना त्यांच्या संस्थेचे पास दाखवून प्रवेश दिला जाईल. तिन टोल नाक्यांवर ग्रामपंचायत सदस्य, जीवरक्षक यांचे पाच जणांचे पथक तिन शिपमध्ये नियुक्त केले जातील. टाळेबंदीच्या काळात ग्रामस्थांना दुध, भाजीपाला किंवा अत्यावश्यक वस्तू लागल्यास त्या आणून देण्याची जबाबदारी त्या प्रभागातील ग्रामपंचयत सदस्यावर सोपवण्यात आली आहे. दुकानदारांनाही घरपोच सेवेसाठी प्राधान्य द्या अशा सुचना दिल्या आहेत. हे काम करणार्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.









